प्रकरण ४ महाराष्ट्राची अर्थव्यवस्था स्वाध्याय

 

प्रकरण ४ महाराष्ट्राची अर्थव्यवस्था

स्वाध्याय

प्रश्न १ अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्द सूचवा : 

  १)    परकीय / विदेशी कंपन्यांनी आपल्या देशात केलेली गुंतवणूक.

उत्तर : प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक

  २)    लघू, मध्यम आणि सूक्ष्म उद्योजकांसाठी सुरु करण्यात आलेला विकास कार्यक्रम .

उत्तर : महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास कार्यक्रम

  ३)    आर्थिक विकासासाठी वस्तूंचे व सेवांचे उत्पादन व विभाजन सुलभ करणे.

उत्तर : आर्थिक पायाभूत सुविधा

  ४)    स्वयंसहाय्यतेचे मूल्य प्रोत्साहित करणे, लोकशाही, समता आणि एकता जपणे.

उत्तर : सहकार चळवळ

प्रश्न २ पुढील पर्यायांमधील विसंगत शब्द ओळखा :

   १)  शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा, कोरडवाहू जमीन, भांडवलाची कमतरता, अभियांत्रिकी

     उत्तर : अभियांत्रिकी

   २)  पर्यटन, बँकिंग, वाहन उत्पादन, विमा

     उत्तर : वाहन उत्पादन

   ३)  पुणे, हैद्राबाद, नाशिक, नागपूर

     उत्तर : हैद्राबाद

   ४)  महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, महाराष्ट्र उद्योग व्यापार व गुंतवणूक सुविधा केंद्र, विशेष आर्थिक क्षेत्र, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ

     उत्तर : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ

   ५)  प्राथमिक शिक्षण, आतिथ्य सेवा, कापड निर्मिती उद्योग, मनोरंजन उद्योग, साखर निर्मिती उद्योग.

     उत्तर : आतिथ्य सेवा   

प्रश्न ३ पुढील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा :

१) यंत्रमानव तंत्रातील संशोधनासाठी जपानने भारतात एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

उत्तर : संकल्पना - प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक

       स्पष्टीकरण :- विदेशी व्यक्तीने किंवा उद्योग संस्थेने दुसऱ्या देशात गुंतवणूक करताना कार्य स्थापित करणे म्हणजे प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक होय.

     या उदाहरणात देखील जपान या विदेशी देशाने भारतात गुंतवणूक केली आहे यालाच प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक असे म्हणतात.

     २) प्राजक्ता व तिचे कुटुंब दिवाळीच्या सुट्टीत आठ दिवस समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेले.

उत्तर : संकल्पना : पर्यटन

       स्पष्टीकरण : एका व्यक्तीने किंवा व्यक्ती समूहाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मनोरंजनासाठी, अभ्यासासाठी, कामासाठी केलेला प्रवास म्हणजे पर्यटन होय. मनोरंजन, फुरसत किंवा कामासाठी केलेला प्रवास म्हणजेच पर्यटन.

     या उदाहरणात देखील प्राजक्ता व तिचे कुटुंब समुद्रकिनारी आनंद घेण्यासाठी गेले होते यालाच पर्यटन असे म्हणतात.

     ३) लातूरचा प्रवीण मुंबई येथे चित्रपटसृष्टीत तंत्रज्ञ म्हणून काम करतो.

उत्तर : संकल्पना : मनोरंजन उद्योग

     स्पष्टीकरण : मनोरंजन उद्योगात विविध नाटके, दूरदर्शन मालिका, चित्रपट इत्यादि उद्योगांचा समावेश होतो. हा उद्योग सेवा क्षेत्रातील महत्वाचा उद्योग आहे. येथे विविध घटकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.

            ) चंद्रपूरची राणीगोंद ही मुंबई-गोवा जहाजावर (क्रुझशीप) जहाजसुंदरी म्हणून काम करते.  

उत्तर : संकल्पना : आतिथ्य सेवा

      स्पष्टीकरण : आतिथ्‍य सेवा उद्योग हा इतर उद्योगांपेक्षा खूप विस्‍तारित आहे. आतिथ्य सेवा उद्योगाचा महत्‍त्‍वाचा उद्देश म्‍हणजे ग्राहकाचे समाधान होय . उपहारगृह आतिथ्य उद्योगाचा एक भाग असून पर्यटकांना वाहतुकीची सेवा पुरवतात. तसेच हवाई प्रवास, जलप्रवास, मुंबई-गोवा (क्रूझशीप), आरामदायी आणि अलिशान रेल्‍वे प्रवास (डेक्‍कन ओडिशी), उपहार गृह, सामान्य पर्यटन व कार्यक्रमांचे व्यवस्थापन इत्‍यादी सेवा पुरवितात.

प्र.४. फरक स्‍पष्‍ट करा :

१) आर्थिक पाय‍ाभूत सुविधा आणि सामाजिक पायाभूत सुविधा.

 

आर्थिक पायाभूत सुविधा

सामाजिक पायाभूत सुविधा

१. अर्थ

आर्थिक पायाभूत सुविधांमुळे विकासासाठी वस्‍तू व सेवांचे उत्‍पादन व वितरण करणे सोयीचे होते.

सामाजिक पायाभूत सुविधा हा मानवी जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी तसेच आर्थिक विकासाला गती देण्यासाठी त्‍याची आवश्यकता असते.

२. उदाहरण

संदेशवहन, उर्जा, वाहतूक इ. आर्थिक पायाभूत सुविधांचे उदाहरण आहे.

शिक्षण, आरोग्य, पर्यटन, मनोरंजन इ. सामाजिक पायाभूत सुविधाचे उदाहरण आहेत.

 

२) शेती क्षेत्र आणि सेवा क्षेत्र.

 

शेती क्षेत्र

सेवा क्षेत्र.

१. अर्थ

पिकांच्या उत्पादनास साहाय्यक ठरणाऱ्या उद्योगांचे क्षेत्र म्हणजे शेती क्षेत्र होय.

ग्राहकांना सेवा देवून त्यांच्या समाधानात वाढ करणाऱ्या उद्योगांचे क्षेत्र म्हणजे सेवा क्षेत्र होय.

२. योगदान  

कृषी व संलग्‍न क्षेत्रातील राज्‍याचे एकूण उत्‍पादनाचे मूल्‍यवर्धित प्रमाण २०१६-१७ मध्ये १२.२ टक्‍के इतके होते.

स्‍थूल राज्‍याअंतर्गत उत्‍पादनात (GSDP) सेवा क्षेत्राचे योगदान,  २०१७-१८ मध्ये ५४.५% इतके होते.

  प्र. ५. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा :

१) महाराष्ट्रातील सहकारी चळवळीची भूमिका स्पष्ट करा ?

उत्तर : महाराष्ट्रातील सहकार चळवळीची भूमिका :

१) सहकार चळवळ हे महाराष्‍ट्राने देशाला दिलेले एक मोठे योगदान आहे.

२) महाराष्‍ट्रातील ग्रामीण भागाच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी सहकार चळवळ हे एक प्रभावी साधन आहे.

३) सहकारी संस्थांची प्रमुख तत्त्वे ही स्वयंसहाय्यता, लोकशाही, समता व एकता इत्यादींना प्रोत्‍साहन देणारी आहेत.

४) सुरुवातीला महाराष्‍ट्रात सहकार चळवळ ही मुख्यत्त्वे कृषी क्षेत्रातील पतपुरवठ्यापर्यंत मर्यादित होती, परंतु नंतर इतर क्षेत्रातही या चळवळीचा विस्‍तार झाला.

उदा. कृषी प्रक्रिया कृषी विपणन सहकारी साखर कारखाने मत्‍स्यव्यवसाय सहकारी संस्‍था सहकारी दूध उत्‍पादक संस्‍था कापड उद्योग गृहनिर्माण सहकारी संस्‍था ग्राहक भांडारे इत्यादी

५) ३१ मार्च २०१७ नुसार राज्‍यात १.९५ लाख सहकारी संस्‍था असून त्‍यांचे ५.२५ लाख सभासद आहेत.

अशा प्रकारे वरील प्रमाणे महाराष्ट्रातील सहकार चळवळीची भूमिका स्पष्ट होते.

२) महाराष्‍ट्रातील कृषीक्षेत्राच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकारने केलेल्या उपाययोजना स्पष्ट करा.

उत्तर : महाराष्‍ट्रातील कृषीक्षेत्राच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकारने केलेल्या उपाययोजना :-

१) वाजवी दरात दर्जेदार बी-बियांणाचे वितरण.

२) खते व कीटकनाशकांच्या वितरण केंद्रात झालेली वाढ.

३) जलसिंचन सोयींचा विकास.

४) शेती पंपांचे विद्युतीकरण व मागणीनुसार वीजपुरवठा.

५) आवश्यकतेनुसार पतपुरवठा.

६) कृषी उत्‍पन्न बाजार समिती (APMC), कृषी उत्‍पादन निर्यात क्षेत्रे, फलोत्‍पादन प्रशिक्षण केंद्र, प्रभावी वितरणासाठी श्रेणीकरण व बांधणी सुविधांची उपलब्‍धतता.

७) प्रसार माध्यमांच्या द्वारे कृषिविषयक माहितीचा प्रसार करून कृषी व्यवसाय हा नफा देणारा व्यवसाय आहे अशा दृष्‍टिकोनाची निर्मिती.

अशा प्रकारच्या उपाययोजना महाराष्‍ट्र आर्थिक पहाणी २०१७-१८ नुसार कृषिक्षेत्राच्या विकासासाठी सरकारने केलेल्या आहेत.

३) महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रासमोरील समस्या स्पष्ट करा.

उत्तर : कृषी क्षेत्रातील सर्वसाधारण समस्‍या :-

i) जमीनधारणेचा कमी आकार व कमी उत्‍पादकता.

ii) सीमांत अल्‍पभूधारक व सीमांत शेतकऱ्यांच्या संख्येत झालेली वाढ.

iii) रासायनिक खते व कीटकनाशकांच्या अति वापरामुळे शेतजमिनीची अवनती.

iv) शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा

v) भू-सुधारणा कायदा व पीक पद्धती यांची सदोष अंमलबजावणी

vi) कोरडवाहू जमीन आणि जलसिंचन सुविधांचा अभाव.

vii) भांडवलाची कमतरता

viii) ग्रामीण विकास योजनांची अयोग्‍य अंमलबजावणी.

ix) विपणन व्यवस्‍थेची कमतरता

x) हवामान बदलांचा परिणाम.

अशा प्रकारच्या समस्या महाराष्ट्रातील कृषिक्षेत्राच्या संबंधित आहेत.

४) महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रातील समस्या स्पष्ट करा.

उत्तर :- महाराष्‍ट्र हे औद्योगिकदृष्‍ट्या प्रगत राज्‍य आहे. वार्षिक औद्योगिक पाहणी (ASI) २०१६-१७ नुसार महाराष्‍ट्र हे औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर आहे. असे असले तरी महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रात समस्या पुढीलप्रमाणे आहेत.

औद्योगिक क्षेत्रातील सर्वसाधारण समस्‍या :-

१) शासकीय दफ्तर दिरंगाई

२) कौशल्‍य विकासाच्या संधींची कमतरता

३) सुधारित तंत्रज्ञानाचा अभाव.

४) पायाभूत सुविधांचा अभाव.

५) नवीन उद्योजकांना प्रोत्‍साहनांचा अभाव.

६) विकास कार्यक्रमांचा अभाव.

७) प्रादेशिक असमतोल

अशा प्रकारच्या समस्या औद्योगिक क्षेत्रात असलेल्या दिसून येतात.

५) महाराष्ट्रातील सामाजिक पायाभूत सुविधांमधील विकासासाठी महाराष्ट्र शासनाने केलेल्या उपाययोजना स्पष्ट करा.

उत्तर : महाराष्ट्रातील सामाजिक पायाभूत सुविधांमधील विकासासाठी महाराष्ट्र शासनाने केलेल्या उपाययोजना :

१) शिक्षण : शिक्षण ही मानवाची मूलभूत गरज आहे. कुठल्‍याही देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचा शिक्षण हा कणा आहे. तसेच मानवी संसाधनाच्या विकासासाठी (HRD) तो आत्‍यंतिक महत्‍त्‍वाचा घटक आहे. भारतात शिक्षणाचे चार स्‍तर आहेत. १) प्राथमिक २) माध्यमिक ३) उच्च माध्यमिक ४) उच्च शिक्षण.

अ) प्राथमिक शिक्षण : महाराष्‍ट्र राज्‍य सरकारने केंद्र सरकारच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत (SSA) ६ ते १४ वयोगटांतील मुलांना मोफत व सक्‍तीच्या शिक्षणाचा अधिकार (RTE) प्रदान केला आहे. २०१६-१७ या आर्थिक वर्षात प्राथमिक शिक्षणावरील राज्‍य सरकारचा खर्च ` १९,४८६ कोटी इतका होता.

ब) माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण : माध्यमिक शिक्षणाचा दर्जा सुधारावा तसेच प्रवेश संख्या वाढावी या उद्देशाने राष्‍ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाची (RMSA) सुरुवात २००९ मध्ये करण्यात आली. २०१६-१७ मध्ये राज्‍य सरकारचा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणावरील खर्च ` १६,०८९ कोटी इतका होता.

     क) उच्च शिक्षण : उच्च शिक्षणामुळे सुधारीत तंत्र व कुशल मनुष्‍यबळाच्या निर्मितीसाठी मदत झाली आहे. उच्च शिक्षण देण्यासाठी २२ विद्यापीठे स्थापन करण्यात आली. राज्‍याने उदारीकरण, खाजगीकरण व जागतिकीकरणाची आव्हाने पूर्ण करण्यासाठी महाराष्‍ट्र राज्‍य सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ अधिनियमित केला. उच्च शिक्षणात लोकशाही तत्‍वाचा वापर करून शैक्षणिक स्‍वायत्‍तता, गुणवत्‍तापूर्ण व कौशल्‍याधिष्‍ठित शिक्षणाचा समावेश करणे हे या कायद्याचे प्रमुख ध्येय आहे.

२) आरोग्‍य सेवा : ३१ मार्च २०१७ पर्यंत महाराष्‍ट्रामध्ये एकूण १८१४ प्राथमिक आरोग्‍य केंद्रे व ३६० सार्वजनिक आरोग्‍य केंद्रे होती. महाराष्‍ट्र सरकारने राष्‍ट्रीय ग्रामीण आरोग्‍य अभियान (NRHM) आणि राष्‍ट्रीय शहरी आरोग्‍य अभियान (NUHM) या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील आरोग्‍य व्यवस्‍था सुधारण्यावर भर दिला या कार्यक्रमांतर्गत सुरक्षित पेयजल, पोषक आहार, आरोग्‍य आणि स्‍वच्छता या बाबींवर सर्वांत जास्‍त भर दिला आहे.

३) पर्यटन : महाराष्‍ट्रात वेगवेगळ्या राज्‍यातून पर्यटक व विदेशी पर्यटक आकर्षित होतात. महाराष्‍ट्रात पर्यटनाचा विकास व्हावा म्‍हणून राज्‍य सरकारने महाराष्‍ट्र पर्यटन धोरण-२०१६ अंमलात आणले.

अशा प्रकारे विविध उपाययोजना महाराष्ट्रातील सामाजिक पायाभूत सुविधांमधील विकासासाठी महाराष्ट्र शासनाने केलेल्या आहेत.

प्रश्न. ६. खालील उतारा वाचून काळजीपूर्वक खालील प्रश्नांची उत्‍तरे लिहा :

आधुनिक युगाची कास धरत देशातील ग्रामीण भाग हायस्‍पीड ब्रॉडबँड इंटरनेट सेवेच्या माध्यमातून जोडण्यासाठी केंद्र शासनानेभारतनेट’ हा महत्‍त्‍वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. देशातील एक लाखाहून अधिक ग्रामपंचायती ‘भारतनेट’ च्या पहिल्‍या टप्प्यात हायस्‍पीड ब्रॉडबँडव्दारे जोडण्यात आल्‍या आहेत. ग्रामपंचायतींना हायस्‍पीड ब्रॉडबँडव्दारे जोडण्याच्या कामात महाराष्‍ट्र उत्‍कृष्‍ट राज्‍य ठरले आहे. १२ हजार ३७८ ग्रामपंचायतीमध्ये इंटरनेट सेवा उपलब्‍ध झाली आहे. महाराष्‍ट्राबरोबर उत्‍तरप्रदेश (पूर्व), मध्य प्रदेश, छत्‍तीसगड, राजस्‍थान आणि झारखंड ही राज्‍येसुध्दा भारत नेटच्या पहिल्‍या टप्प्यात उत्‍कृष्‍ट ठरली आहेत.

१) केंद्र शासनाने ‘भारतनेट’ हा कार्यक्रम का हाती घेतला?

उत्तर :  ग्रामपंचायतींना हायस्‍पीड ब्रॉडबँडव्दारे जोडण्याकरिता केंद्र शासनाने ‘भारतनेट’ हा कार्यक्रम हाती घेतला.

२) देशातील किती ग्रामपंचायतीमध्ये इंटरनेट सेवा उपलब्‍ध झाली आहे?

उत्तर : देशातील एक लाखाहून अधिक ग्रामपंचायतीमध्ये इंटरनेट सेवा उपलब्ध झाली आहे.

३) महाराष्‍ट्राशिवाय इतर कोणती राज्‍ये भारतनेट मध्ये उत्‍कृष्‍ट ठरली आहेत?

उत्तर : महाराष्‍ट्रा बरोबर उत्‍तरप्रदेश (पूर्व), मध्य प्रदेश, छत्‍तीसगड, राजस्‍थान आणि झारखंड ही राज्‍येसुध्दा भारत नेटच्या पहिल्‍या टप्प्यात उत्‍कृष्‍ट ठरली आहेत

४) ‘इंटरनेटमुळे जग जवळ आले आहे’ याबद्दल तुमचे मत सांगा.

उत्तर : इंटरनेटमुळे जगातील विविध व्यक्ती आपापसात संवाद साधू शकतात, दोघांमध्ये माहितीची देवाणघेवाण करता येते. इंटरनेटच्या माध्यमांद्वारे उद्योगांचा विकास होण्यास मदत झाली आहे. अशा प्रकारे इंटरनेटमुळे जग जवळ आले आहे.

*****

 

Comments

Popular posts from this blog

स्वाध्याय प्रकरण १ अर्थशास्त्रातील मुलभूत संकल्पना

प्रकरण २ पैसा स्वाध्याय

11 वी अर्थशास्त्र सहामाही परीक्षा प्रश्नपेढी